ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप
Amravati News: वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत तसेच गटग्रामपंचायतींच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. कुठे वीज नाही, तर कुठे गॅस कनेक्शनचा अभाव आहे. काही अंगणवाड्यांमध्ये शौचालय आणि स्नानगृहाचीही सुविधा उपलब्ध नसल्याने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने अंगणवाड्यांच्या कामकाजासाठी निश्चित वेळापत्रक ठरवून दिले असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.(फोटो सौजन्य – AI)
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस निर्धारित वेळेत उपस्थित राहत नसल्याने काही अंगणवाड्या वेळेवर सुरू होत नाहीत. तर काही ठिकाणी अंगणवाड्या बंदच आढळून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच बालकांना पोषण आहारातून सकस आहार मिळावा, यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार पुरविला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाचा उद्देश आणि प्रत्यक्ष लाभार्थी बालके यांच्यात मोठी तफावत निर्माण झाल्याचे चित्र आहे. काही अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची सुविधाच उपलब्ध नाही. त्यातच काही ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने बालकांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या ब्लिचिंग पावडरचाही पुरेसा वापर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीतील बालकांना पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांतील बालके मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मुलभूत सुविधांची कमतरता दूर करावी, सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून द्यावा तसेच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह, वीज आणि गॅसची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायतला समस्यांबाबत तक्रार केली आहे. परंतु आम्हाला सरपंच व सचिवांकडून सहकार्य मिळत नाही. साधना पांडे, पर्यवेक्षक, बेनोडा (शहीद) अंगणवाडीच्या समस्या पंचायत समितीच्या सभेत कृती आराखडा व बजेटमध्ये मांडण्यात येणार आहे, अशी माहिती – नयना इंगोले, महिला बालकल्याण प्रकल्प विभाग यांनी दिली आहे.






