पारा ४० पार...! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त
अमरावती : विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे अमरावतीकरांना उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला व वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून, पुढील काही दिवसात वातावरणात बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली असून, दुपारच्यावेळी रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमालयावर पश्चिमी विक्षोभ ट्रफरेषेच्या स्वरूपात सक्रीय आहे. त्यासोबतच चक्राकार वारे वाहत असून, उद्या आणखी १ नवीन पश्चिमी विक्षोभ हिमालयाला धडकण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली. या सर्व हवामान घटकांच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत विदर्भातील वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जात असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील वर्दळही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, बाजारपेठाही काही काळ ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून, शनिवारपासून काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रविवारी पूर्व विदर्भ तसेच यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसासह गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे. सोमवारी पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची तर पूर्व विदर्भ व यवतमाळ जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली. बुधवारपर्यंत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही वातावरण ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता असून, गुरुवारपासून पुन्हा कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
उन्हाची तीव्रता वाढताच शहरातील शीतपेय, उसाचा रस, लिंबूपाणी आणि थंड पेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत असल्याचे चित्र सर्वत्र
पाहायला मिळत आहे.
कडक उन्हामुळे नागरिक झाडांची सावली, आडोशाला थांबून विश्रांती घेताना दिसत आहेत. दुचाकीस्वारही रस्त्याच्या कडेला सावली मिळेल त्या ठिकाणी थांबून काही वेळ विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






