आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य-X)
मुंबई : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.
फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्या. तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोठ्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २४०२.५९ कोटी.
दरम्यान,६ व ७ ऑगस्ट या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल २१ पेक्षा जास्त कार्यक्रम, आढावा बैठका घेऊन पाहणी कली. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून, मंजुरी किंवा निधीअभावी रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावले. याच दौऱ्यात त्यांनी बीड-नगर रेल्वे प्रकल्पाच्या उर्वरित अडथळ्यांचा आढावा घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट संपर्क साधत मंजुरी मिळवली. पुढील २० दिवसांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून १७ सप्टेंबर रोजी ही रेल्वेगाडी बीड स्थानकातून धावणार आहे.