
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाळ्याची सुरुवात मार्चपासून मानली जात असली तरी यंदा उष्णतेची चाहूल फेब्रुवारीअखेरच लागली. मार्चच्या पहिल्याच दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाने जोरदार उसळी घेत नागरिकांना उन्हाच्या झळा बसल्या. नागपुरात कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
विदर्भातील इतर जिल्ह्यांतही उष्णतेची तीव्रता वाढली आहे. वर्धा व अमरावती येथे तापमान ३७ अंशांवर पोहोचले. अकोला आणि चंद्रपूरमध्ये पारा ३६ अंशांपुढे गेला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान नोंदविले गेले. भंडाऱ्यात तर एका दिवसात तब्बल ४.८ अंशांची वाढ झाली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच थंडी ओसरल्याचे चित्र होते. रात्रीचे किमान तापमान १७ ते १९ अंशांदरम्यान होते, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या सरासरीत होते. यंदा होळीपूर्वीच उकाडा वाढल्याने हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागने उष्णतेचा प्रभाव वाढण्याचा इशारा दिला.
हेदेखील वाचा : तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल
तापमान वाढल्यामुळे उष्माघात, निर्जलीकरण यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मैदानी काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि हलके, सैल कपडे परिधान करणे आवश्यक आहे.
कूलिंग शेल्टरची तयारी ठेवा
तसेच पाणी व विजेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानेही पाणीपुरवठा आणि कूलिंग शेल्टरची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. विदर्भात उन्हाळ्याची सुरुवातच कडक झाल्याने एप्रिल-मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्यातही तापमानात वाढ
गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. रविवारी (ता.१) देखील किमान तापमानामध्ये घट झाली. परिणामी, शहरात थंडी परतली असून पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस हळूहळू पुणे शहरातील तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहर आणि परिसरात गेल्या पाच दिवसांत सहा अंश सेल्सिअसची घट झाली आहे. कमाल तापमान स्थिर आणि आकाश निरभ्र असल्याने दुपारी कडक उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.