
फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News : जिल्हा काँग्रेस कमिटीने परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात जोरदार निदर्शने केली. सोमवारी शहरातील जयस्तंभ चौकात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती राजकीय दबाव आणि वैयक्तिक सूडबुद्धीपोटी करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच संस्थेचे विश्वस्त आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
निदर्शनानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित गुन्हे तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रकाश पाटील अवचार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्या तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्या तक्रारदारांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे खंडणीचे आरोप झालेले आहेत. संस्थेच्या अध्यक्षांशी असलेल्या जुन्या वादातून आणि राजकीय आकसातून ही कारवाई घडवून आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. निष्पक्ष चौकशी न करता संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेली परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था गेल्या 33 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे. अशा संस्थेच्या विश्वस्तांवर कोणतीही सखोल आणि निष्पक्ष चौकशी न करता गुन्हे दाखल करणे अन्यायकारक असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ज्या प्रमाणपत्रांच्या आधारे कारवाई करण्यात आली ती प्रमाणपत्रे चिखली तहसील कार्यालय, नगरपालिका आणि सावरगाव डुकरे ग्रामपंचायतीने अधिकृतरीत्या जारी केलेली होती. संबंधित अभिलेखांमध्ये त्यांची नोंद उपलब्ध असून, तत्कालीन सरपंचांनीही प्रतिज्ञापत्राद्वारे ती प्रमाणपत्रे वैध असल्याचे मान्य केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेची बाजू न ऐकता तयार करण्यात आलेला अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
यावेळी काँग्रेसने केवळ विश्वस्तांवरील गुन्हे रद्द करण्याचीच नव्हे, तर शासन आणि पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या तक्रारदारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली. तसेच चुकीचे अथवा बनावट अहवाल तयार करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात अॅड. हरिश रावळ, रशिदखा जमादार, दत्ता काकस, देवानंद पवार, अतिक उर रहिमान जवारीवाले, भूषण मापारी, डॉ. मोहम्मद इसरार, समाधान सुपेकर, प्रदीप अंभोरे, रिजवान सौदागर, शेख समद, आश्रु फुके, अॅड. भाऊराव भालेराव, विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, दीपक देशमाने यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी आणि संबंधित प्रकरणात न्याय्य चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली.