मुंबई – मध्य रेल्वेच्या (Central Railway) रेल्वे संरक्षण दलातील (RPF) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास जागरुक राहतात, परंतु कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवतात. “मिशन जीवन रक्षक”चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंत मध्य रेल्वेवर आतापर्यंत 62 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घातला. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
[read_also content=”भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-wins-most-sits-in-gram-panchayats-at-bhandara-district-337101.html”]
दरम्यान, या 62 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 24, नागपूर विभागात 14, पुणे विभागात 12, भुसावळ विभागात 8, आणि सोलापूर विभागात 4 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवतात. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात. आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवण्यात आला आहे. पण शेवटी जीव वाचवणाऱ्यांच्या या कृतीचा परिणाम आनंदोत्सव, सुखकारक आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.