मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार
प्रश्नोत्तर सत्रादरम्यान नितीन गडकरी यांना महाराष्ट्रातील खासदारांनी तीन महत्त्वाच्या मार्गांबाबत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने प्रश्न विचारले. यामध्ये काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याच वेळी सुप्रिया सुळेंनी पुणे-कोल्हापूर मार्गाबद्दल चर्चा केली आणि अरविंद सावंत यांनी बहुचर्चित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबद्दल चर्चा केली. या वेळी नितीन गडकरी यांनी तिन्ही मार्गांबाबत उत्तर दिले.
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला आणि नितीन गडकरी यांनी त्यावर काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली. “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक कंत्राटदार बदलले गेले. फक्त जमीन अधिग्रहणाची समस्या होती. पण आतापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल. कोणताही विलंब होणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच पुणे-कोल्हापूर मार्गाचे कामही प्रलंबित आहे. या संदर्भात नितीन गडकरी यांनी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. “पुणे ते सातारा मार्गाचे काम रिलायन्सकडे होते. ते रद्द करून या कामाचा पुन्हा आमचा विभाग आढावा घेत आहेत. पुण्यातील बायपास सेवेचे काम विभागाने सुरू केले आहे. खंबाटकी घाटातल्या नव्या दोन बोगद्यापैकी एक बोगदा लवकरच सुरू होईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढच्या आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केलं जाईल”, असं ते म्हणाले.
काँग्रेसच्या धुळे खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला आणि गडकरी यांनी उत्तर दिले. “हा प्रकल्प २०१० मध्ये बोओटीमध्ये पूर्ण झाला. २०१६ मध्ये पहिले नूतनीकरण एक वर्ष उशिराने झाले. कंत्राटदाराला १६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. २०२१ मध्ये दुसरे नूतनीकरण पुन्हा एक वर्ष उशिरा झाले. त्यावर ७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. सध्या तिसरे नूतनीकरण सुरू आहे. ते जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शेवटची अंतिम मुदत एप्रिल २०२६ आहे. जर धुळे ते पिंपळगाव चौपदरी रस्ता उपलब्ध नसेल, तर तो वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तो मान्य झाला आहे, लवकरच समस्या दूर केली जाईल आणि काम सुरू होईल”, असे नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-६६ महामार्गाचे रुंदीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. ३५५.२८ किमी महामार्गापैकी ३३४.३४ किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जे ९३.१८% काम पूर्ण झाले आहे हा प्रकल्प गेल्या दशकाहून अधिक काळापासून सुरू आहे. भूसंपादन आणि इतर समस्यांमुळे विलंब होत आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्ते परिस्थिती आणखी बिकट करतात. सध्या, मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी १२ ते १३ तास लागतात. तथापि, नवीन महामार्गामुळे प्रवास ८ ते १० तासांचा होणार आहे.






