
"महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रांत ..."; 'Navbharat Inspiring Women Summit' मध्ये विजया रहाटकरांचे विधान
नवभारत इंस्पायरिंग वुमन समिट’मध्ये विजया रहाटकर यांचे प्रतिपादन
अंगणापासून ते अंतराळापर्यंत भारतीय महिलांची उत्तुंग भरारी
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची उपस्थिती
मुंबई: मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आज ‘नवभारत इन्स्पायरिंग वुमन समिट अँड अवॉर्ड्स’ सोहळा पार पडला. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या सोहळ्यात भारतीय महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले. विजया रहाटकर म्हणाल्या, “आपल्या देशातील महिला आज अंगणापासून अंतराळपर्यंत प्रगती घेत आहेत.”
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या आजच्या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या सोहळ्याला संबोधित करताना विजया रहाटकर म्हणाल्या, “हा कार्यक्रम माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आणि मनाला भिडणारा आहे. हा सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून आपल्या कष्टाने आणि जिद्दीने स्वतःची दिशा निवडणाऱ्या माता- भगिनींना ओळख प्राप्त करून देणारा सोहळा आहे.”
पुढे बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, ” ‘नवभारत’ केवळ महिलांच्या कार्याचे कौतुकच करत नाही, तर त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे धैर्य वाढवतो. दरवर्षी गुणवंत महिलांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देणारा हा स्तुत्य उपक्रम ‘नवभारत’ राबवतो, याचा मला मनापासून आनंद आहे.”
एका मराठी कवितेचा दाखला देत विजया रहाटकर म्हणाल्या, “महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्वत:चा ठसा उमटवत आहेत. महिलांचा त्याग आणि त्यांची तपश्चर्या आज सर्वांनाच दिसत आहे. रात्रंदिवस स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करणे, यातूनच त्यांनी आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे.”
महिलांचा सन्मान करणारी विचारधारा
पुढे बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, “महिलांचा सन्मान करणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हीच आपली मूळ विचारधारा आहे. राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ते झाशीची रआणि लक्ष्मीबाईपर्यंत सर्वांचे अतुलनीय योगदान आहे. भारताला यशाच्या शिखरावर नेण्यामागे देशातील महिलांची विशेष मेहनत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज भारताच्या लेकी यशाची पताका फडकवत आहेत. आज जगातील सर्वाधिक महिला पायलट भारतात आहेत. गावापासून शहरापर्यंत महिला अतिशय उत्तम काम करत आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी, अधिकारांसाठी आणि सन्मानासाठी देशात जे कायदे बनले आहेत, ते महिलांनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.” तसेच, दरवर्षी महिलांसाठी ‘नवभारत’ आणि माहेश्वरी परिवार करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे.”
या कार्यक्रमात राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि प्रसिद्ध उद्योगपती तसेच बजाज ग्रुपचे अध्यक्ष कुशाग्र बजाज यांच्या हस्ते शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला आणि क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत असामान्य योगदान देणाऱ्या महिलांना ‘नवभारत इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
या प्रख्यात महिलांची लाभली विशेष उपस्थिती
या सोहळ्याला बडोदा राजघराण्याच्या राजकुमारी अंजनाराजे गायकवाड, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे, बजाज ग्रुपच्या जीएम आनंदमयी बजाज, रायन ग्रुपच्या एमडी स्नेहल पिंटो, डॉ. अदिती कराड, अॅड. वेदिका चौबे, ग्रेविड इंडियाच्या संस्थापिका प्रतीक्षा रत्ना, सह-संस्थापक स्टॅनली सॅम्युअल, टोरल इंडियाच्या संस्थापिका प्राची गीते, सोलो क्लिनिक आयव्हीएफच्या संस्थापिका डॉ. सुनीता तांदुळवाडकर, आविशाच्या संस्थापिका डॉ. शीतल सवानकर, ब्लूमच्या संचालिका डॉ. रिश्मा पई, एडलवाइज म्युच्युअल फंडच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रशिदा रूपावाला, निपॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या सीनियर फंड मॅनेजर मिनाक्षी दावर, डीएसपी म्युच्युअल फंडच्या सीनियर फंड मॅनेजर अपर्णा कर्णिक आणि इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सच्या वरिष्ठ अधिकारी भावना वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘नवभारत’चे ग्रुप एडिटर संजय तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, “नवभारत आणि नवराष्ट्र हे प्रत्येक हिऱ्याची पारख करतात. गुणवंत महिलांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो.” यावेळी त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष कुशाग्र बजाज यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मंचावर नवभारत-नवराष्ट्रचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव देखील उपस्थित होते. नवभारत-नवराष्ट्र मुंबईचे उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) स्टीव्हन सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.