
Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभागामार्फत निवेदन सादर केले आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होईल, ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका, ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वनक्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी. चंद्रपूर-मूल रोडवरील ओव्हरपास आणि बामणी-आष्टी रोडवरील अंडरपासच्या कामांना मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे. कन्हाळगाव व घोडाझरी अभयारण्य वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन तेथे कर्मचारी नियुक्ती व गावविकासाची कामे करावीत. जिल्हा परिषदेमार्फत संवेदनशील गावांना ‘बिबट समस्यामुक्त ग्राम योजना’ ला मंजुरी आणि निधी उपलब्ध करून द्यावा. चंद्रपूर जिल्ह्याला अधिकृतपणे ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करून उपाययोजनांत एकसूत्रता आणावी.
ताडोबा, कन्हारगाव व घोडाझरी पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के प्रत्यक्ष लाभ स्थानिक गावांना मिळण्यासाठी धोरण निर्णय घेणे, अभयारण्यालगत स्थानिक लोकांच्या माध्यमातून ‘कम्युनिटी रिसॉर्ट होमस्टे व जिप्सी’ चालवण्यास प्रोत्साहन द्यावे. वनव्याप्त गावांमध्ये पोलीस पाटीलच्या धर्तीवर ‘वनपाटील’ नियुक्त करावेत. चंद्रपूर येथील प्रस्तावित रेस्क्यू सेंटरचे काम वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करून गती द्यावी.
या क्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारचे वन्यप्राणी आढळतात, ज्यांच्या अधिवासावर गदा येईल. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होईल. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. बंडू धोतरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, वाघ व इतर वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवण्याच्या, वाघाचा अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या आणि गेल्या ५ वर्षात २०० ग्रामस्थांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती आणि प्रस्तावित खाणीचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ३ मार्चपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल.