
पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक (Photo Credit- X)
वारंवार कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमुळे वायू प्रदूषणाची समस्याही अधिक गंभीर बनली असल्याचे आ. दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी झाल्याचा दावा चुकीचा असून, त्या भागासाठी स्वतंत्र आरोग्य सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. वायू व जलप्रदूषणाची नियमित तपासणी व्हावी, तसेच लिचेट (कचऱ्यातून तयार होणारा दूषित द्रव) प्रक्रिया यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे की नाही, याचीही चौकशी करावी.
छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असल्याने परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कचऱ्याचे वाढते ढिगारे, वारंवार लागणाऱ्या आगी तसेच मिथेनसह विषारी वायूंचे उत्सर्जन यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.… pic.twitter.com/rxRKoMsDvm — Ambadas Danve (@iambadasdanve) July 8, 2026
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पडेगाव प्रकल्पातील प्रदूषणाचा मोठा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणे तातडीने थांबवावे, साठलेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने हटवावा आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.
पडेगाव व चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पांवर शासनाने सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही. हे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिक प्रक्रिया आणि इतर उपक्रमांचा कोणताही पारदर्शक हिशेब नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
प्रश्नाच्या उत्तरात मंत्री पंकजा मुंडे यांनी, या प्रकरणाची निश्चित चौकशी करण्याचे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात येतील असे सांगितले. महापालिकेने यावर आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे आम्हाला कळविले असल्याचेही त्या म्हणाल्या. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. सध्या दोन ठिकाणी काम व्यवस्थित सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण स्वतः महापालिकेत विशेष बैठक घेणार असून स्वतः स्थळपाहणी देखील करणार आहे. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतही मंत्री मुंडे यांनी सभागृहात सांगितले.