
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा (Photo Credit- X)
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून ग्रामीण भागात तिचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळले जात आहे. संपूर्ण एप्रिल महिना उष्णतेचा गेला. विक्रमी ४३ अंशाच्याही वर कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मात्र उष्माघाताचा एकही रुग्ण जिल्ह्यात
आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. सध्या दिवसा तसेच रात्रीचे तापमानही लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी उष्माघातासदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, २७ व २८ एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सुमारे १२ रुग्ण उष्माघातासदृश्य लक्षणांमुळे शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे व कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे किंवा घाम बंद होणे, अशी उष्माघाताची लक्षणे असून, अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नु, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विविध शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये दाखल झालेल्या १२ रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
| अ. क्र. | तालुका | रुग्णसंख्या |
| १ | फुलंब्री | ३ |
| २ | पैठण | २ |
| ३ | वैजापूर | २ |
| ४ | सिल्लोड | २ |
| ५ | खुलताबाद | १ |
| ६ | गंगापूर | १ |
| ७ | छ. संभाजीनगर | १ |
| एकूण | १२ |
वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने उष्माघातापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी व द्रवपदार्थाचे सेवन करावे. हलका व पचायला सोपा आहार घ्यावा. तहान नसेल तरीही ठराविक वेळेत पाणी पीत रहावे. शरीरातील पाणीपातळी संतुलित ठेवावी. डोक्यावर टोपी, ओढणी, छत्रीचा वापर करावा. लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ