
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान (Photo Credit- X)
सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, थंडीमुळे मतदानाची गती हळू होती. मात्र साडेदहानंतर मतदानाने वेग घेत दिवसभरात अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांसमोर रांगा असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावंगी हसूल, तसेच फुलंब्री तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तर पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, उबाठा नेते अंबादास दानवे आदींनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, मतदान केंद्रांवर महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांची कुमक तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ सदरील निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली. आत प्रवेशासाठी कोणी परवानगी दिली याची झोनल ऑफिसरकडून वस्तुनिष्ठ माहिती घेत याचा अहवाल सादर करा तसेच याची चौकशी केली जाणार असून, दोषी आढळ्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. तर खा. संदीपान भुमरे यांनी, आपण सर्वजण मतदानाला कुटुंबासोबत जात असतो, तरीही मी बाहेर असल्याने या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन सांगेल, म्हणत अधिक बोलणे टाळले.
सिल्लोड तालुक्यातील एका मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले, या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळासाठी मतदान प्रक्रिया मंदावली होती, मात्र नंतर पुन्हा सुरळीत सुरू झाली.
पाचोड परिसरातील मतदान केंद्रावर आ. विलास भुमरे हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मतदान केंद्रात गेले, अशी घटना समोर आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आ. भुमरेसह मुलाच्या बोटालाही मतदान कर्मचाऱ्याने शाई लावल्याचे तसेच मुलासह आ. भुमरे हे मतदान कक्षातदेखील एकत्र गेल्याचे देखील व्हिडिओत दिसत आहे. मतदानाच्या गोपनीयतेबाबत नियमभंग झाल्याचेही बोलले जात आहे. विरोधी पक्षांकडून हे प्रकरण उचलून धरण्याची शक्यता असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. अद्याप याबाबत तक्रार दाखल नसल्याने निवडणूक विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाळूज परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले. मशीन बंद पडणे, मत नोंद न होण्याच्या तक्रारी यामुळे मतदारांमध्ये असंतोष दिसून आला. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवल्याचे प्रक्रिया पुढे सुरळीत सुरु झाली.