
वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल (Photo Credit- AI)
शहरातील मुस्तफा पार्क परिसरातील रहिवासी तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त अधिकारी सलीम मुहम्मद पटेल पावना प्रकरणामुळे हा वाद अधिकच चर्चेत आला आहे. सौर यंत्रणा बसवण्यापूर्वी दरमहा दोन ते अडीच हजार रुपये येणारे वीज बिल, सौर संच बसवल्यानंतर चक्क एक लाख रुपयांपर्यंत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलीम पटेल यांनी दंड रद्द करून वीज बिल दुरुस्त करावे तसेच सौरऊर्जा निर्मितीबाबत स्पष्ट कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे आवश्यकतेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्याचा ठपका ठेवत महावितरणकडून अन्यायकारक पद्धतीने दंड आकारण्यात आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या वैजापूर उपविभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली असून आपण नियमित वीज ग्राहक असून कोणतीही थकबाकी किंवा नियमभंग केलेला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, अतिरिक्त वीज निर्मितीबाबत कोणतीही पूर्वसूचना, तांत्रिक मार्गदर्शन किंवा स्पष्ट नियमांची माहिती देण्यात आली नसताना थेट दंड आकारण्यात आला.
Mahavitaran News: महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित
महावितरणने 13 फेब्रुवारीपासून नवीन अटी लागू केल्याचे सांगितले जात आहे. जुन्या ग्राहकांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती केल्यास दंड आकारला जात आहे, तर नवीन ग्राहकांना त्यांच्या सरासरी वीज वापरापेक्षा जास्त क्षमतेचे सौर युनिट बसवण्यास परवानगी नाकारली जात असल्याची तक्रार आहे.
केंद्र सरकारकडून सौरऊर्जेसाठी कोट्यवधींच्या सबसिडीची घोषणा करण्यात आली असताना, जास्त वीज निर्मितीबद्दल प्रोत्साहन देण्याऐवजी दंड आकारला जात असल्याने सौरऊर्जा धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयांमुळे सौर पॅनल बसवणाऱ्या हजारो उद्योजकांचीही अडचण झाली आहे.
वीज बचतीसाठी लाखो रुपये खर्चुन सौर संच बसवलेल्या ग्राहकांना आता 60 हजार ते लाख रुपये पर्यंत वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सौर संच बसवल्यानंतर बिल शून्य किंवा अत्यल्प येण्याची अपेक्षा असताना उलट मोठी बिले येत असल्याने अनेक ग्राहक पश्चाताप व्यक्त करत आहेत. वैजापूर शहरातील अनेक ग्राहकांना 40 ते 60 हजार रुपयांची बिले मिळाल्याचा दावा करण्यात येत असून प्रति युनिट 40 ते 60 रुपये दर कोणत्या कायद्यानुसार आकारला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले; पाहा काय आहे नेमके कारण?