
छत्रपती संभाजीनगर पालिकेत 'रिल्स वॉर'! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला (Photo Credit- Ai)
सध्या महापालिकेत सदस्यांचा आवाज घुमू लागला आहे. निवडणूकअंती महापालिका सभागृहात सर्वाधिक ५८ सदस्य भाजपचे पोहोचले. भाजप (५८) आणि शिवसेना (१२) यांनी एकत्र येत पालिकेवर सत्ता स्थापन केली. तर भाजप पाठोपाठ सर्वाधिक ३३ सदस्यांसह एमआयएम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. दरम्यान, शिवसेना आणि एमआयएममध्ये पूर्वीपासून सुरु असलेली घुमश्चक्री वेळोवेळी पालिकेतही पाहायला मिळत आहे.
सत्ता काबीज करण्यासाठी एमआयएमने पूर्ण प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना अपयश आले. अखेरीस विरोधी बाकावर बसून ते आता सत्ताधाऱ्यांवर नजर ठेवत आहेत. एमआयएमला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना भाजप सोडत नाही. एमआयएम नगरसेवकांना औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर म्हटल्याशिवाय निधी मिळणार नसल्याचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी स्पष्ट केलेले आहे. शहागंज चौकात ठेले लावण्यावरून शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल आणि एमआयएम मधील वादही चांगलाच गाजला.
जंजाळ यांच्या टीकेच्या प्रत्युत्तरात एमआयएम नगरसेवक ओसामा कादिर मौलाना यांनी जंजाळावर प्रतीवार केला. आम्ही विकासाच्या रिल्स बनवतो. त्या व्हायरल करतो. जे आरोप करत आहेत त्यांचे एकदा इतिहास पाहावा. त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले, ते कोणत्या आरोपामध्ये जेलमध्ये गेले हेही त्यांनी पहावे. तुमच्यावर दंगलीचे आरोप आहेत. काहीही बोलण्याआधी आपल्या पदाची, सभागृहाची गरिमा ठेवावी. तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही जनतेची कामे करत आहोत. आमच्यावर लोकांच्या कामांसाठी केसेस दाखल झाल्या आहेत. आम्ही दंगली घडवल्या नाहीत. हिंदू मुस्लिम वाद होतात तेव्हा हेच सर्वात पुढे असतात. जीभ आमच्याकडेही आहे आम्हीच बोलू शकतो असा इशाराही एमआयएम नगरसेवकाने दिला.