
४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)
घरी परतताना परिसरात फिरणाऱ्या चार ते पाच मोकाट श्वानांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला आणि तिला ओढत रस्त्याच्या कडेला नेले. तिच्या हातापायांवर, पाठीवर आणि शरीराच्या विविध भागांवर चावे घेत लचके तोडले. नागरिकांनी तत्काळ धाव घेत श्वानांच्या घोळक्यास हुसकावून लावले आणि मुलीची सुटका केली. आई नसीम बेगम सय्यद यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील आयशाला उचलून तातडीने घाटीत दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या आयेशावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधत तातडीने श्वानांना पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित विभागाचे पथक नारेगाव परिसरात दाखल झाले असून श्वान पकडण्याचे काम सुरू करण्यात आले.
कुत्र्यांनी हल्ला केलेल्या जखमी चिमुकलीच्या शरीरावर १०० पेक्षा अधिक जखमा आहेत. डॉक्टरानी तिला अँटी रेबिज सिरम दिले असून तिची प्रकृती लक्षात घेता तिला बालरोग अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात घडलेल्या या घटनेने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. निरागस बालिकेवर ओढवलेला हा प्रसंग शहराच्या प्रश्नचिन्ह सुरक्षाव्यवस्थेवर निर्माण करणारा ठरला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस, दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात मोकाट श्वानांची संख्या गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढल्याची तक्रार सातत्याने पुढे येत आहे. अनेक वसाहतींमध्ये मोठ्या टोळक्या मुक्तपणे फिरताना दिसतात. पहाटे आणि रात्री नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरतात, महापालिकेकडून निर्बिजीकरण व त्यांना पकडण्याची मोहीम राबवल्या जात असल्याचा दावा केला, श्वानांना पकडून शहरालगतच्या भागांत सोडले जात असल्याने तेथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. नारेगाव, भावसिंगपूरा, हर्सुल, सातारा, देवळाई, छावणी, जटवाडा, बालाजी नगर या भागांत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिक तीव्र असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन