
धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही (Photo Credit- X)
देशाच्या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, देशात एकूण ७३६ टायर पायरोलिसिस कारखाने अस्तित्वात आहेत. यापैकी केवळ सुमारे ४६ टक्के कारखाने पर्यावरणविषयक नियमांचे पालन करतात, तर उर्वरित कारखाने नियमबाह्य किंवा अपूर्ण पालन करत असल्याचे नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे, या केंद्रीय संस्थेकडेही महाराष्ट्रातील कारखान्यांची अद्ययावत व खात्रीशीर स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय अहवालामध्ये विखुरलेल्या नोंदींमधून महाराष्ट्रात सुमारे १०३ टायर पायरोलिसिस कारखाने असल्याचा उल्लेख आढळतो, मात्र ही संख्या कोणत्या वर्षाची आहे, त्यातील किती कारखाने सध्या कार्यरत आहेत आणि किती बंद, याबाबत स्पष्टता नाही. हीच बाब राज्याच्या पर्यावरणीय नियंत्रण व्यवस्थेची मोठी मर्यादा ठरत आहे.
नवराष्ट्रने केलेल्या क्षेत्रीय पाहणी आणि उपलब्ध कागदपत्रांच्या अभ्यासातून महाराष्ट्रात शंभराहून अधिक टायर जाळणारे कारखाने अस्तित्वात असल्याचे आढळून आले. अनेक कारखाने ग्रामीण व अर्धशहरी भागांत कार्यरत असून, धूर, दुर्गंधी व राखीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
देशात ७३६ टायर पायरोलिसिस कारखाने आणि त्यातील निम्म्याहून कमी कारखान्यांकडून नियमांचे पालन, ही पाश्र्वभूमी असताना, महाराष्ट्रातील अचूक माहितीच उपलब्ध नसणे हीच सर्वात धोकादायक बाब ठरते. नवराष्ट्रने उघड केलेल्या या वास्तवामुळे, राज्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा आणि मंत्रालयीन पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्यात किती कारखाने परवानाधारक आहेत, किती बेकायदेशीर आहेत आणि किती नियमांचे उल्लंघन करतात, याची अधिकृत व सार्वजनिक माहिती उपलब्ध नसल्याने नियंत्रण यंत्रणा कमकुवत ठरत आहे. देशात जिथे शेकडो कारखाने असून निम्म्याहून अधिक नियमांचे पालन करत नसतील, तिथे महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यात परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.