
वैजापुरात पाण्यावरून वादंग; 'बोरदहेगाव'तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय
तालुक्यातील जळगाव खिर्डी, करंजगाव आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार रमेश बोरनारे यांनी प्रशासनास आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर येथील नांदूर मदमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अटी व शर्तीसह बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी पत्र काढून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नदीपात्रात धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.
मात्र विभागाचे शाखा अभियंता पवन चव्हाण व सहकारी बोर दहेगाव धरणावर पाणी सोडण्यासाठी गेले असता, धरण क्षेत्रातील गोळवाडी, बेंदवाडी, शिवराई व परसोडा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. संबंधित शेतकऱ्यांनी नदीपात्रात थेट पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणावर अपव्यय होऊन पाण्याची नासाडी होईल, अशी भूमिका मांडली. नदीपात्रातील काही कोल्हापुरी बंधारे सुस्थितीत नसल्याचे तसेच धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. धरणातून पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही; मात्र पाण्याच्या होणाऱ्या नासाडीला आमचा विरोध आहे. प्रथम पाटांची दुरुस्ती करूनच पाणी पाटाद्वारे सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे नांदूर मधमेश्वर विभागाच्या अभियंत्यांकडे केली. दरम्यान, बोर दहेगाव मध्यम प्रकल्पावर पाणी सोडण्याच्या निर्णयावरून दोन गटांमध्ये स्पष्ट मतभेद दिसून आले.
प्रकल्प क्षेत्रातील वरच्या गावांतील विरोध दर्शवला आहे तर खालच्या बाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परंतु विरोध व समर्थन पाहता सध्या तोडगा निघाला नाही. त्यामुळे पाणी नदीत सोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबाबत तोडगा काढून लवकरच बोरनदीमध्ये विसर्ग सोडण्यात येईल.
– पवन चव्हाण, शाखा अभियंता, नांमका विभाग, वैजापूर
काही गावांतील शेतकरी व ग्रामस्थ नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या बाजूने ठाम होते, तर इतर गावांतील शेतकरी पायाभूत सुविधा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी सोडू नये, या भूमिकेवर ठाम राहिले. दोन्ही बाजूचे शेतकरी मोठ्या संख्येने धरण परिसरात जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. गोंधळ व संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याने नांमका विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी न सोडता माधार घेतली. त्यामुळे बौर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला असून, पुढील निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.