
अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! 'अमृत-२' योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू
केंद्र शासनाच्या अमृत-२ अभियानांतर्गत २ हजार ७४० कोटी रुपयांच्या खर्चातून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतजीव्हीपीआर कंपनीकडून प्रकल्पाचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर योजनेची चाचणी सुरू करण्यात आली होती. जायकवाडी धरण परिसरातील जॅकवेलमधून ३८ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यात आले. जलवाहिनी व यंत्रणांच्या यशस्वी चाचणीनंतर स्वच्छता मोहीम राबवून पाण्याची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार तपासण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शुद्ध केलेले पाणी एमबीआरमध्ये साठविण्यात आले.
विभागीय आयुक्तांच्या समितीने पाहणी करून शहरासाठी या साठ्यातून पाणीपुरवठ्यास मंजुरी दिल्यानंतर गुरुवारपासून पुरवठा सुरू करण्यात आला. प्रारंभी एमबीआरमध्ये २० एमएलडी पाणी साठविण्यात आले असून त्यापैकी १० एमएलडी पाणी महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत सोडण्यात आले. त्यामुळे शहराला सध्या मिळणारे पाणी १७० वरून १७५ एमएलडीपर्यंत पोहोचले आहे.
राज्यातील सर्वांत मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी ही एक योजना मानली जाते. जायकवाडी धरणातून थेट जलउपसा, ३८ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या क्षमतेचे साठवण प्रकल्प ही तिची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाल्याने प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अलीकडेच ७५ एमएलडी क्षमतेची योजना सुरू केली आहे. या योजनेतून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे १५ एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. यापूर्वी २६ एमएलडी पाणी मिळत होते. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी