सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेत बदल करावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरसह देशभर लाखो तरुणांनी आंदोलन केले, त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला पण आंदोलन करणाऱ्यांवर भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अमानुष वागणूक देत लाठीहल्ला केला, पेलेट गन चालवल्या, मुलींशी असभ्य वर्तन केले. आंदोलक तरुणांना देशद्रोही, पाकिस्तानधार्जीणे म्हणून बदनाम केले आणि आता त्याच तरुणाईशी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत संवाद साधतात, यालाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज चली’, असे म्हणतात. पण त्यांच्या या ढोंगीपणावर तरुणाई विश्वास ठेवणार नाही. आधी तरुणाईची माफी मागा व मोदी शाह यांनाही माफी मागण्यास सांगा, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले, साध्या वेशातील पोलीस, RAF जवानांकडून लाठीहल्ला करण्यात आला, दगडांनी भरलेला ट्रक आणून आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. या तरुणांवर पेलेट गन चालवण्यात आल्या, तो आदेश कोणी दिला होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह संसदेत निवेदन का करत नाहीत व देशाची माफी का मागत नाहीत? कारण या सर्व प्रकाराला ते जबाबदार आहेत म्हणून ते संसदेत जाण्यास घाबरत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी शाह यांना माफी मागण्यास सांगितले पाहिजे. अन्यथा त्यांच्या तरुणाईशी संवाद साधण्यास काहीच अर्थ उरत नाही, तरुणाई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.
ट्विटवरुन लोंढेंचा निशाणा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरलेला होता त्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून ते ट्विट होते, व्यक्तिपरत्वे नव्हते. पण काही लोकांकडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या मुद्द्याचा वापर करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.






