
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल
नवी दिल्ली : पक्ष संघटनावाढीसाठी काँग्रेसने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची बैठक दिल्लीत संपन्न झाली असून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह मंडल आणि ग्राम स्तरापर्यंत सर्व विभागात नियुक्त्या होणार आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या नविन महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली.
सपकाळ म्हणाले की, संघटन सृजन अभियानाची बैठक दिल्लीत पार पडली व या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील नेतृत्वावर चर्चा करण्यात आली, यातून नवे जिल्हाध्यक्ष मिळतील तशीच पारदर्शक प्रक्रिया तालुका पातळीवरही तालुकाध्यक्ष निवडीसाठी झाली आहे. ही सर्व चर्चा सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. जिल्हाध्यक्षाबरोबर काही जणांना प्रदेश पातळीवरही काम करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने तालुका पातळीवर हे अभियान राबविले, यातून ब्लॉक अध्यक्ष सेवादल, एसएसी, एसटी, ओबीसी या विभागांत नवीन नियुक्त्या होतील. तालुका पातळीपासून नवीन पदाधिकारी नियुक्त केले जातील. या प्रक्रियेत ७ हजार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून महिला, मागासवर्गीय, तरुण व सर्व घटकांना तसेच नवीन जुने व अनुभवी यांनाही यात संधी दिली जाणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महारांजाच्या इतिहासाची विकृत पद्धतीने मांडणी करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न भाजपा व रा. स्व. संघाकडून केला जात आहे. धीरेंद्र शास्त्रीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध लावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची विकृत मांडणी केली व शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व पराक्रम नाकारण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपा व संघाने खुलासा केलेला नाही व सरकारने कारवाईही केली नाही. धीरेंद्र शास्त्रीनंतर आता आनंद स्वरुप का दुखःद स्वरुप नावाचा आणखी एक कोणी भोंदू शिवाजी महाराजांनी लढाया केल्या नाहीत, छापेमारी केली अशी सडकछाप मांडणी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, कर्तृत्व नाकारत आहे. आतापर्यंत भाजपा व त्यांचे बगलबच्चे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करून चुकीचा इतिहास सांगत आहेत, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रा. स्व. संघाने खुलासा करावा व अशा बेताला बडबड करणाऱ्यांवर सरकारने कठोर शिक्षा करावी. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर चकार शब्द काढत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना शिंदे गप्प का? छत्रपतींची विकृत मांडणी एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेना मान्य आहे का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.