संग्रहित फोटो
सावंतवाडी : नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांचे नाव व फोटो समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सावंतवाडीची बदनामी झाली आहे. हे प्रकरण अत्यंत लाजीरवाणे असून, या प्रकरणाची निष्पक्ष ‘एसआयटी’ चौकशी होईपर्यंत आमदार केसरकर आपल्या पदाचा राजीनामा देणार का? असा संतप्त सवाल काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे. केसरकरांनी स्वतःहून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर जनआंदोलन छेडले जाईल, असाही इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून अशोक खरात याच्या भोंदूगिरीचे, जमिनी बळकावल्याचे आणि स्त्रियां संदर्भातील गंभीर व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहेत. या प्रकरणात केसरकर यांचे नाव प्रामुख्याने पुढे येत असल्याने सावंतवाडीकरांची मान शरमेने खाली गेली आहे. २८८ आमदारांमध्ये केवळ आपल्याच आमदाराचे नाव ‘खास भक्त’ म्हणून अशा प्रकरणात येणे ही लज्जास्पद बाब आहे, असे वंजारी यांनी म्हटले आहे.
रूपाली चाकणकरांचा दाखला आणि निधीचा प्रश्न
साक्षी वंजारी यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचा दाखला दिला. “या प्रकरणात नाव आल्यानंतर चाकणकर यांनी तातडीने राजीनामा दिला, मग केसरकर का थांबले आहेत? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, सावंतवाडी मतदारसंघाचा निधी नाशिक किंवा सिन्नर भागातील रस्त्यांसाठी वळवला जात असल्याची कुजबुज सोशल मीडियावर सुरू असून, जर हे सत्य असेल तर सावंतवाडीकरांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी
या प्रकरणावर टीका करताना वंजारी यांनी पुढील प्रमुख मागण्या व आरोप केले.
निष्पक्ष चौकशी : पवई एन्काउंटर प्रकरणाप्रमाणे याही वेळी केसरकरांना ‘क्लीन चिट’ मिळणार की मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
बुवाबाजीच्या दंतकथा : सावंतवाडी परिसरात केसरकरांच्या बुवाबाजीच्या चर्चा नेहमीच रंगतात, या फोटोंमुळे त्या चर्चांना आता बळकटी मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
आमदारांनी स्वतःहून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर जनआंदोलन छेडले जाईल. अशाही इशारा वंजारी यांनी दिला आहे. या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, आता सत्ताधारी यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकांपुरते सावंतवाडीत यायचे आणि नंतर मतदारसंघाला पोरके करायचे, ही मनोवृत्ती आता खपवून घेतली जाणार नाही. लोकशाहीत नैतिकतेला स्थान असेल, तर केसरकरांनी पदमुक्त होऊन चौकशीला सामोरे जावे. — साक्षी वंजारी, अध्यक्ष, महिला काँग्रेस, सिंधुदुर्ग






