
धाराशिवमध्ये बनावट खतांचा भांडाफोड; कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश
धाराशिव : खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना चक्क लालसर मातीची विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी विभाग, खत विक्रेते आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनेला काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात बोगस रासायनिक खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.
पाच वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार नवीन नसून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माथी बनावट खत मारले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून भरून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर प्रकार
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत बनावट खतांचा हा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
खत आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खताच्या नावाखाली माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. या रॅकेटमागील सूत्रधारांना अटक करुन त्यांची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करावी, अशी भुमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.
ट्रकमधील खत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
या प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संशयित खताने भरलेला ट्रक थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही पोती उघडून पाहण्यात आली असता त्यामध्ये खताऐवजी माती असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित कंपनी व विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.