बेंबळी पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? कमी क्षमतेच्या पंपामुळे नागरिक टँकरवर अवलंबून
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. सुमारे २५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला अत्यल्प क्षमतेच्या विद्युतपंपाद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेंबळी गावाला सुमारे ९ किलोमीटर अंतरावरील रुईभर मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात गरजेपेक्षा कमी क्षमतेचे विद्युतपंप बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे महिन्यातून केवळ एकदाच नळाला पाणी येत असल्याची स्थिती निर्माण झाली असून महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत नूतन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी तलाव परिसरातील पंपहाऊस व जॅकवेलची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता स्वप्नील सुळे, ग्रामसेवक आदिनाथ केवळराम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणीत पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी स्पष्ट झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उच्च क्षमतेचे (हाय कॅपॅसिटी) विद्युतपंप बसविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामुळे येत्या काही दिवसांत बेंबळी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास धुरगुडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या योजनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली असून नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली जुन्याच पाईपलाईनला रंग देऊन नवी असल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप होत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला रुईभर तलावातील जॅकवेल तसेच बरमगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कमी क्षमतेचे पंप तात्काळ बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याऐवजी ताशी एक ते सव्वा लाख लिटर क्षमतेने पाणी उपसा करणारे नवीन विद्युतपंप बसविण्यात येणार आहेत. हे काम आठ दिवसांत पूर्ण करून बेंबळीचा पाणीपुरवठा नियमित करण्यात येईल, असे उपअभियंता स्वप्नील सुळे यांनी स्पष्ट केले.
तसेच, अंदाजपत्रकानुसार नवीन पाईपलाईन न टाकता जुनीच वापरली असल्यास त्याचीही तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे बेंबळी पाणीपुरवठा योजनेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.






