शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, जुलै आणि ऑगस्ट या महत्त्वाच्या महिन्यांत तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. दीर्घकाळ पावसाने खंड दिल्याने अनेक भागांतील खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके वाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहिल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासोबतच पीक अनुदान आणि आवश्यक आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली.
पावसाच्या खंडाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर पशुधनावरही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठीही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
खरीप पिकांचे नुकसान, पावसातील मोठा खंड, शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.
निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विचार विभागाचे अध्यक्ष खलील सय्यद, जावेद काझी, धाराशिव शहराध्यक्ष धनंजय राऊत, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, अंकुश पेठे, संदीप कदम, धोंडीराम करंजकर, सुधीर गव्हाणे, संतोष वडवले, इमाम शेख, डॉ. रमाकांत वाघमारे, विकास ढवळे, दिगंबर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता काँग्रेसच्या या मागणीनंतर प्रशासन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि दुष्काळी परिस्थितीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






