
धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. BLO चे शासकीय काम पूर्ण करून परतत असताना चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तथा बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद इंगळे हे निवडणूक विभागाच्या BLO कामानिमित्त दिवसभर शासकीय जबाबदारी पार पाडून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, बेंबळी येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, इंगळे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गोविंद इंगळे हे शांत, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कनगरा व बेंबळी परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर संबंधित रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याचे काम अत्यंत हलक्या प्रतीचे करण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे उंचवटे, खड्डे आणि धोकादायक ‘जम्पिंग पॉईंट’ निर्माण झाले आहेत. याशिवाय आवश्यक ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना किंवा इशारा फलक नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांनी जीव गमावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित ठेकेदार आणि कामाची देखरेख करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “निकृष्ट दर्जाचे रस्ते काम आणि प्रशासनाची निष्काळजीपणा यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. या मृत्यूला केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही,” असे धुरगुडे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात त्यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या रस्त्याची तातडीने तांत्रिक चौकशी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील निकृष्ट रस्ते कामाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.