
धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर मुसळधार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला. विशेषतः धारूर परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की, शेतजमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याने जणू बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता.
या वादळामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्ष, लिंबू यांसारख्या फळबागांना तसेच कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. झाडांची फांदी मोडून पडल्याने आणि गारांच्या माऱ्यामुळे फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब व रोहित्र कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. धारूर येथे एका पुलावरून टिप्पर घसरून पुराच्या पाण्यात पडल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विठ्ठलवाडी येथे शेतात काम करत असताना बबन लांडगे या शेतकऱ्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील, तहसीलदार मृणाल जाधव आणि तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाने यांनी बाधित भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.