
पवन ऊर्जा प्रकल्पांचा 'काळा' कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर 'खंडणी'चे गुन्हे (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजता खानापूर शिवारात पवनचक्की प्रकल्पासाठी सबस्टेशन साहित्य घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दत्तात्रय शिवाजी माने (वय ४१, रा. शिरगाव ता. वाई जि. सातारा, सध्या रा. मैत्री पार्क, वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्यात दगडू जुळजीराम लगाडे, रणजित दगडू लगाडे, धम्मदीप रणजित लगाडे, प्रशांत रत्नप्रकाश शिंदे, आकाश अच्युत लगाडे, किरण वसंत शिंदे, अविनाश राजेंद्र लगाडे (सर्व रा. खानापूर ता. वाशी) तसेच निलेश लगाडे (रा. इंदापूर ता. वाशी) यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी नांदगाव शिवारात सबस्टेशन उभारणीसाठी साहित्य वाहतूक करणारी वाहने आरोपींनी ट्रॅक्टर व मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून अडवली. करारनाम्यानुसार रक्कम दिलेली असतानाही वाहन सोडवण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास वाहने जाळून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
धाराशिवमध्ये महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प; रोजगारासाठी अर्थसहाय्य व शहर विकासाच्या घोषणा
मात्र, दुसरीकडे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे वेगळेच चित्र मांडणारे आहे. त्यांच्या मते, पवन ऊर्जा कंपन्यांकडून सुरुवातीला मोठ्या मोबदल्याचे आश्वासन देऊन करार केले जातात, परंतु प्रत्यक्षात अत्यल्प दर देऊन जमिनी ताब्यात घेतल्या जातात. करारातील अटींचे पालन न करता कामे सुरू ठेवली जातात. याला विरोध केल्यास शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करून दबाव आणला जातो.
“जमीन आमची, पण निर्णय कंपनीचा” अशी संतप्त भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खानापूर प्रकरणातही नेमका वाद काय, करारातील अटींची अंमलबजावणी झाली का, याबाबत स्पष्टता नसताना थेट गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर खानापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी संघटना व स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी केली आहे.
तज्ञांच्या मते, पवन ऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक आणि विकासासाठी आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाऊ नयेत. करार प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, योग्य मोबदला देणे आणि दोन्ही बाजूंमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे. दरम्यान, वाशी पोलीस ठाण्यात दाखल असून, प्रशासनाने या प्रकरणात संतुलित भूमिका घेत शेतकरी व कंपन्या यांच्यातील वाद मिटवून न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.