
नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान 'या' जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः नदीकाठावरील व पूरप्रवण भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.
Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प
तसेच, वीज कोसळण्याच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडाखाली थांबणे टाळावे आणि अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या असून कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी केले आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी तडाखा बसणार आहे. मुंबई आणि कोकण भागात तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. २३ ते २५ एप्रिल दरम्यान, कोकण आणि मराठवाड्याच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत विदर्भ प्रदेशातही तापमान वाढण्याची शक्यता असून, २४ एप्रिल रोजी अमरावती आणि अकोला येथे उष्णतेच्या पिवळ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.