
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याचा गोडवा विरघळला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
धाराशिव : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच झालेल्या पावसामुळे, गुढी पाडव्याचा गोडवा अवकाळी पावसात विरघळला, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. बुधवारी, गुरुवारी सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगांनी भरून आले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील विविध भागांत कोसळला. धाराशिवसह परंडा, भूम, कळंब, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक जाणवला.
या अनपेक्षित पावसामुळे काढणीस आलेली गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात भिजून गेली. परिणामी काढणीस आलेल्या पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला असून पिकांची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो, वांगी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा, डाळिंब यांसारख्या फळझाडांची फुले व लहान फळे गळून पडली आहेत.
याच दरम्यान गुढी पाडव्याच्या सणाची तयारी करणाऱ्या नागरिकांनाही या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला. घराबाहेर गुढी उभारण्यासाठी सजावट, साफसफाई आणि खरेदी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ उडाली. बाजारपेठांमध्ये अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. फुलं, हार, सजावटीच्या वस्तूंची विक्री मंदावली, तर काही ठिकाणी पावसामुळे या वस्तूंचे नुकसानही झाले.
ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. एका बाजूला सणाचा आनंद साजरा करण्याची वेळ असताना दुसऱ्या बाजूला शेतीच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सण साजरा करण्याऐवजी नुकसानाचा आढावा घेण्यात गुंतलेले दिसून आले. वादळी वाऱ्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. काही गावांमध्ये पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
दरम्यान, कृषी व महसूल विभागाच्या पथकांनी नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून प्राथमिक अहवाल गोळा करण्यात येत आहे. अधिकृत नुकसानाची आकडेवारी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिकांची योग्य काळजी घेण्याचे आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. एकूणच, मराठी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना अवकाळी पावसाने सणावर विरजण घातले असून, धाराशिव जिल्ह्यात आनंद आणि चिंता यांचे मिश्र चित्र पाहायला मिळत आहे.
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे आव्हान; शेती बटाईने देण्याचे कल