
वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम
वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान मोठा दुष्परिणाम दिसून येत आहेत. तळोधी बा, वाढोणा, सावरगाव, येनोली, गोविंदपूर, कान्हाळगाव परिसरात धानपिकाला खोड किडा, बुरसी अस्या विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका वसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागभीड तालुक्यात उन्हाळी धानपीकाची रोवणी होऊन १५ दिवस लागवडीला झाले आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत असून तापमाणात सतत चढ-उतार होत आहे. यामुळे उन्हाळी धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात दरवर्षी पेक्षा यंदा खाजगी बोरवेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी गाव तलाव आणि घोडझरीच्या कालव्यामुळे उन्हाळी धान पिकाची लागवड केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी मक्याची कडधान्य लागवड केली.(फोटो सौजन्य – istock)
सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’
परंतु, यावर्षी रोगाचा एवढा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकनाशकाची फवारणी करूनही रोग नाहीसे होत नाही आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात धान पीक दोन पटीने जास्त निघतात. याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे धानपिकाला पोषक वातावरण मिळते व धानाला मोठ्या प्रमाणात फुटवे निघतात. त्यामुळे उन्हाळी धान पीक पावसाळी धानपिकापेक्षा जास्त असते. वातावरणाच्या बदलामुळे धानपिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्यसारखे रोग उद्भवतात. यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिकावर परिणाम होऊन उत्पन्नात घट होण्याची स्थिती निर्माण झाली. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
रब्बी हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली असून, काही भागात पिके काढणीस आली. गत ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला पिकावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी किटकनाशक औषधीसह अन्य फवारणी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू, वटाणा या पिकासह टमाटर, वांगी व अन्य भाजीपालावर्गीय पिकाचे उत्पादन शेतकरी घेतो. परंतु, यावर्षी अगोदरच भाजीपाल्याचे भाव कोसळले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारपेठेत आवक वाढली. मात्र, भाव कोसळल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यावर बसत आहे.
आठवड्याभरापासून तूर व सोयाबीनचे भाव कोसळले. मध्यंतरी कापसाला चांगला भाव मिळाला व आता पुन्हा साडेसहा ते ७ हजार रुपयांवर आलेला आहे. कापसाचे भाव एका क्विंटलमागे १ हजार रुपयांनी घसरले. शेतमालाचे भाव सातत्याने घसरत असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यावर बसत असल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे. सध्या आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने कोबी, फूलकोबी, वांगी, टमाटर याचे भाव निम्म्यावर आले असून, १० रुपये प्रति किलो शेतकरी विकत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे, शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली. मात्र, ग्राहकांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीपाल्याला उठाव नसल्याचे सांगितले जात आहे.