ठाकरे बंधूंच्या भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, "जर राज ठाकरेंनी..."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही बंधू आज एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. २०१९ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक आली होती तेव्हा राज ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर होते. मात्र २०२२ नंतर राज ठाकरे महायुतीबरोबर गेले. दरम्यान कित्येक दिवसांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. यावर आता आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.
मला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद आहे. एकनाथ शिंदेंची प्रतिमा कॉमन मॅन अशी आहे त्यानुसारच आम्हा सर्वाचं काम करण्याचं ध्येय आहे. मला सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यात अनेक आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता आमचे दौरेही सुरु होतील. सोमवारी उदय सामंत आणि मी बीड येथील मस्साजोग या ठिकाणी जाणार आहोत. तसंच परभणीचा दौराही आम्ही करणार आहोत. मराठवाड्यात ज्या घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही पोहचून कुटुंबियांची भेट घेणार आहोत. वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा बसेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत कणखर भूमिका घेतली आहे असं संजय शिरसाट म्हणाले. यानंतर त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर भाष्य केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची लग्नात भेट झाली म्हणून राजकीय वातावरण तापण्याचं काही कारण नाही. जर तसं काही करायचं असतं तर राज ठाकरेंनी विधानसभेच्या वेळी केलं असतं. राज ठाकरेंनी अनेकदा टाळी द्यायचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी हात कायमच मागे घेतला. मला वाटत नाही की हे दोन बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील. आत्ता तरी ही स्थिती नाही की हे दोघंही एकत्र येतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं दादरमध्ये थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब हजेरी लावली. याच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसाची इच्छा आहे, पण राजकीय नसली तरी तर कौटुंबिक कारणामुळे ठाकरे एकत्र आले होते.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. ती काय होती त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का अशा चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगल्या अशून दोन बंधू आणि राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चां सुरु झाल्या आहेत.