मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आता इलेक्ट्रिक बस!
मुंबई: हरित गतिशीलतेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या मुंबादेवी मोबिलिटीने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या सहकार्याने मुंबईसाठी इलेक्ट्रिक बसच्या पहिल्या तुकडीचे लोकार्पण केले. या उपक्रमामुळे मुंबई शाश्वत, स्वच्छ आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे कोलाबा येथील बेस्ट कार्यालयात आयोजित अधिकृत समारंभात १२ मीटर लांबीच्या ४ संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस श्री. आशिष शर्मा, महाव्यवस्थापक, बेस्ट यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.”
मुंबईत २५० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा प्रारंभ असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. ओशिवरा डेपोमधून या बस कार्यरत राहतील, ज्याची निवड प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांना सेवा पुरविण्यासाठी रणनीतीपूर्वक करण्यात आली आहे.
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने डिझाइन व निर्मिती केलेल्या नव्या १२ मीटर लांबीच्या बस प्रवाशांच्या सोयीसह शाश्वततेचे उत्कृष्ट संयोजन सादर करतात. प्रत्येक बसमध्ये चालकासह ३६ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून, व्हीलचेअर प्रवेशाची सुविधा तसेच अधिक लवचिकतेसाठी ३ फोल्डेबल (घडीच्या) आसनांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४०० मिमी उंचीच्या लो-फ्लोअर डिझाइनमुळे बसमध्ये चढणे-उतरणे अधिक सुलभ झाले असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर व सर्वसमावेशक ठरतो. ३६६.६६ केडब्ल्यूएच क्षमतेच्या एलएफपी बॅटरीसह सुसज्ज या बस एका चार्जवर २५० किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात, ज्यामुळे त्या मुंबईच्या दैनंदिन शहरी मार्गांसाठी आदर्श ठरतात. पीएमएसएम मोटर प्रणाली प्रवासाला अधिक सुरळीत आणि कार्यक्षम बनवते, तर बसमधील अत्याधुनिक सुलभता सुविधा प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी अनुभव देतात
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या सीईओ डॉ. आंचल जैन म्हणाल्या, “मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रगत आणि दूरदृष्टीपूर्ण ध्येयात भागीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही बेस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या लोकार्पणातून शाश्वत गतिशीलतेप्रती शहराची ठाम वचनबद्धता अधोरेखित होते. या प्रवासात आपला सहभाग नोंदविण्याचा आम्हाला अभिमान असून, आगामी काळात मुंबईच्या हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी सातत्याने योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. नियोजित वेळेआधी बसेस सुपूर्द करणे म्हणजे प्रशासन आणि उद्योग हातात हात घालून काम केल्यास काय साध्य करता येते याचे उत्तम उदाहरण आहे. आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत आणि भारताच्या शाश्वत व भविष्योन्मुख सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासात साथ देण्यास कटिबद्ध आहोत.”
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी आज भारतातील शाश्वत सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत आहे. सध्या कंपनीची उपस्थिती देशातील ३१ शहरांमध्ये असून, २,७०० हून अधिक ई-बस विविध महत्त्वपूर्ण प्रदेशांमध्ये यशस्वीरीत्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतातील लडाख, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपासून, पूर्वेकडील पश्चिम बंगाल व ओडिशा, दक्षिणेतील केरळ आणि पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्र व गोवा या राज्यांपर्यंत कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. या विस्तारामुळे देशभर शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे