पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
पंढरपूर: आषाढी यात्रेचा सोहळा सुरळीत पार पडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आषाढी यात्रेच्या नियोजनावर केंद्रित असून यंदा सुमारे २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा संपल्यानंतरच या प्रकरणातील चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील चंदन खरेदी आणि महावस्त्र (वस्त्र खरेदी) प्रक्रियेत कथित आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप यापूर्वी मुकुंद बडवे यांनी जिल्हाधिकारी व विधी व न्याय खात्याकडे लिखित तक्रारी करण्यात आले होत्या. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे पत्र पाठवले होते. मात्र, त्यानंतर या चौकशीचे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आता आषाढी यात्रा संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या कथित गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केल्याने मंदिर समितीतील खरेदी व्यवहार पुन्हा एकदा तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
मंदिर समितीने विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या चंदन खरेदी तसेच देवांच्या महावस्त्र खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचे तसेच यामध्ये गैर व्यवहार झाल्याचा आरोप मुकुंद बडवे यांनी केला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यासंबंधीच्या तक्रारी विविध विभागाकडे केल्या होत्या. खरेदीची प्रक्रिया, दर, निविदा आणि खर्च याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या आरोपांमुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर विकास आराखड्यातून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू असून, मंदिर विकास आराखड्यातून झालेल्या कामांची तसेच करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करून माहिती घेतली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रविणकुमार घम उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
आढावा बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एका कृतीने उपस्थित अधिकारी, भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांना व्हीआयपी दर्शनाची सुविधा सहज उपलब्ध होऊ शकत होती. मात्र, रविवारी मंदिरात दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी आणि रांगेत उभ्या असलेल्या हजारो वारकऱ्यांचा विचार करून त्यांनी व्हीआयपी दर्शन नाकारत केवळ मुखदर्शन घेतले. पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील आणि वारकरी भावनेचा सन्मान करणाऱ्या भूमिकेचे भाविक व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.






