फोटो सौजन्य- सोशल मीडिया
माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील राजूर या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे आदी उपस्थित होते.
काल सायंकाळी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, मधुकरराव पिचड यांचे ब्रेनस्ट्रोकमुळे नाशिक येते निधन झाले. दोन महिन्यापासून ते नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
त्यांना श्रध्दांजली देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी मधुकरराव कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. निळवंडे धरणाचे 20 किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून या धरणाचे काम मार्गी लागले. या धरणामुळेच आज 100 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. या धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात यावे याकरिता त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. अनेक विषयांचे ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक आणि विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
मधुकरराव पिचड यांचा राजकीय प्रवास
मधुकरराव पिचड यांनी स्थानिक निवडणुकीतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1980 ते 2014 या कालावधीकरिता अहिल्यानगर येथील अकोले मतदारसंघांचे आमदार होते. या काळात त्यांनी अनेकदा मंत्रिपदाची धुरा सांभाळली. 1995 ते 1999 याकाळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला.