
मुसळधार पावसामुळे 'या' जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी (Photo Credit- X)
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची धुवांधार हजेरी पाहायला मिळाली. विशेषतः वसई आणि विरार परिसराला पावसाने झोडपून काढले असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या दृश्यांमध्ये काही भागांत वाहने वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हायअलर्टवर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दुसरीकडे, मुंबईतही मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची मोठी कोंडी झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हा सबवे वाहतुकीसाठी तात्काळ बंद केला आहे आणि वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवस पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर आणि मुंबई उपनगरातील आपत्कालीन परिस्थिती पाहता, “नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे नेवली नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, ज्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला आणि वाहतुकीचा सामान्य प्रवाह विस्कळीत झाला. पावसाचे पाणी साचल्याने बदलापूर-काटई मार्गावरील वाहनांची ये-जा तात्पुरती थांबवण्यात आली. वाहतूक पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गांकडे वळवली आणि पाणी ओसरेपर्यंत व परिस्थिती सुधारेपर्यंत वाहनचालकांना या बाधित मार्गाचा वापर टाळण्याचा सल्ला दिला.