जुन्नर मधील शिवनेरी गडावर शिवजयंतीदिनी मधमाशी हल्ला केला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार सोमवारी (दि.17) शिवजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने मोठ्यासंख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर जमले होते. शिवनेरी गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जात होती. मात्र शिवजयंतीवर मधमाश्यांच्या हल्ल्याचे सावट पसरले. शिवनेरीवर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवनेरीला भेट देणाऱ्या शिवभक्तांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच शिवभक्तांनी किल्ल्यावर येताना सर्तक राहण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवनेरीवर मधमाश्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील हल्ला करण्यात आला. यानिमित्ताने वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी किल्ले शिवनेरी गडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीच्या तयारीसाठी रविवारी गडावर आलेल्या शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी घेतलेल्या चाव्यामध्ये 47 जण जखमी झाले. पर्यटनासाठी गेलेल्या काही तरुणांनी पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशा चवताळल्या. यानंतर त्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. तर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांच्या हातातील मशालीच्या धुरामुळे या मधमाशा सैरभैर झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
काल (दि.17) शिवजयंतीनिमित्त गडावर मोठी गर्दी होती. यावेळी शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली. यानंतर वनविभाग, पुरातत्व विभागाचे कर्मचारी, जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात ४७ पैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता शिवनेरी गड हा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे देखील शिवनेरी गडावर गेले होते. यावेळी देखील मधमाशांचा हल्ला झाला. या मधमांशांना अज्ञातांनी डिवचल्याने त्यांनी हा हल्ला केल्याची माहिसी समोर येत आहे. मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या जोपर्यंत मधमाशा शांत होत नाही, तोपर्यंत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे. तसेच या मधमाशांना डिवचणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.