कोल्हापूर : ऐतिहासिक गांधी मैदान (Gandhi Maidan) फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले असून, या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यासाठी सुमारे २५ कोटींचा निधी अपेक्षित असून, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) माध्यमातून या मैदानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावू, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
गांधी मैदानाची दुरावस्था आणि आवश्यक उपाययोजना याबाबात श्री शिवाजी तरूण मंडळाच्या वतीने शिवाजी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले की, गेले अनेक वर्षे या मैदानाची दुरावस्था झाली आहे. याबाबत शिवाजी पेठेतील नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. या मैदानास निधी मंजूर व्हावा आणि मैदानाचा वापर पूर्ववत खेळासाठी व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. गांधी मैदानासह शिवाजी पेठेतील इतर महत्वाची विकासकामे आणि प्रश्न क्षीरसागर यांनी मार्गी लावावीत, अशी मागणी करत श्रेयवाद करण्यापेक्षा शिवाजी पेठेतील प्रत्त्येक नागरिकाने शिवाजी पेठ म्हणजे मी असा विचार करून शिवाजी पेठेचा लौकिक वाढवावा, असे सांगितले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, निवडणुकांपुरते काम करण्याची आपली कार्यपद्धती नाही. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, नागरिकांना सोयीसुविधा मिळवून देणे हे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेतील नागरिक कायम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभे आहेत. त्यामुळे या पेठेतील नागरिकांचे आणि माझं जिव्हाळ्याच नातं निर्माण झालं आहे. यापूर्वी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून १५ कोटी आणि पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.