ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
अमरावती विभागातील यंदाच्या खरीप हंगामाने शेतीतील बदलत्या पीकपद्धतीचे स्पष्ट चित्र समोर आणले. रोख उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन आणि कापूस पिकांनी विभागातील बहुतांश क्षेत्र व्यापले असून, पारंपरिक ज्वारी-बाजरीची लागवड ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मका पिकाने अपेक्षेपेक्षा मोठी झेप घेत सरासरी क्षेत्राच्या तब्बल १५१ टक्के क्षेत्रावर पेरणी नोंदविली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतीचा कल अन्नधान्य पिकांकडून नगदी आणि बाजारपेठाभिमुख पिकांकडे अधिक वेगाने वळत असल्याचे स्पष्ट झाले.(फोटो सौजन्य – istock)
अमरावती विभागात सोयाबीनचे वर्चस्व यंदाही कायम राहिले असून, १४.६३ लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १३.४२ लाख हेक्टरवर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून तेथे सरासरीच्या ११२ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दुसरीकडे, कापूस पिकानेही आपली मजबूत पकड कायम ठेवत १०.९२ लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १०.८० लाख हेक्टरवर (९९ टक्के) पेरणी गाठली. यवतमाळमध्ये ४.८७ लाख हेक्टर (१०३ टक्के) आणि अमरावती जिल्ह्यात २.६७ लाख हेक्टर (१०० टक्के) क्षेत्रावर कापूस लागवड पूर्ण झाली. मात्र, या चित्राची दुसरी बाजू चिंताजनक आहे.
एकेकाळी पश्चिम विदर्भाच्या अन्नसाखळीचा आधार असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. २९ हजार ८५६ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी अवघ्या २ हजार ८३५ हेक्टरवर म्हणजे केवळ ९ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. बाजरीची स्थिती तर आणखी गंभीर असून, ५३७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ १० हेक्टरवरच पेरणी झाली. त्यामुळे पारंपरिक तृणधान्ये शेतीतून हळूहळू हद्दपार होत असल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू झाली. याउलट, मक्याने यंदा विक्रमी वाढ नोंदविली. ४५ हजार ४६२ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ६८ हजार ६५२ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून हे प्रमाण १५१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
विभागातील ४.४९ लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४.२९ लाख हेक्टरवर (९६ टक्के) तुरीची लागवड झाली. तसेच कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीला शेतकऱ्यांची पसंती कायम आहे. मात्र, पावसाच्या विलंबाचा फटका अल्पमुदतीच्या मूग आणि उडदाला बसला. ३५ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ हजार ७८९ हेक्टरवर (१७ टक्के) मुगाची पेरणी झाली, तर ३१ हजार ३२७हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६ हजार ३५६ हेक्टरवर (२० टक्के) उडदाची लागवड झाली. एकूणच, यंदाच्या पेरणीच्या आकडेवारीतून अमरावती विभागातील शेती नगदी पिकांवर अवलंबून होत असल्याचे स्पष्ट झाले.
Ans: अमरावतीत सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. तसेच मक्याची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत मक्याची १५१ टक्के पेरणी झाली आहे.
Ans: शेतकऱ्यांकडून बाजारपेठेतील मागणी, उत्पादनाची अपेक्षित मिळकत, पाण्याची उपलब्धता आणि पीक व्यवस्थापन यांसारख्या विविध कारणांमुळे पिकांच्या निवडीत बदल होऊ शकतो.