
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असून या भागातून वाहणाऱ्या दोन्ही नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक वाढते.दुसरीकडे कर्जत तालुक्यात 2021 मध्ये मंजूर असलेल्या जलजीवन मिशन मधील बहुतांश नळपाणी योजना बंद अवस्थेत आहेत. तालुक्यात त्यावेळी केंद्र सरकारची महत्वाची असलेली हरघर जल ही संकल्पना कर्जत तालुक्यात फेल गेली आहे. तालुक्यात 121 नळपाणी योजना जलजीवन मिशन मधून मंजूर होत्या,त्यातील 33 नळपाणी योजना कार्यान्वित झाल्या होत्या. तर अन्य योजना निधी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे या नळपाणी योजना यांचे पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अर्ध्या भागात नळपाणी योजना अभावी पाण्याची टंचाई वाढली आहे. कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पोश्री आणि चिल्हार या दोन्ही नद्या आणि त्यांच्या उपनद्या साध्या कोरड्या ठाक आहेत.त्यामुळे पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात असून 39 वाड्या आणि 22 गावे पाणीटंचाई ग्रस्त आहेत.या सर्व ठिकाणी मागणीनुसार मार्च पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे नियोजन पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आले आहे.
मात्र कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एप्रिल महिन्यात शासकीय टँकर सुरू करण्यात आले. आजच्या तारखेला तालुक्यात चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकर मधून पाणी पोहचवले जात आहे.त्यासाठी 14 हजार लिटर क्षमता असलेले टँकर यांची मदत घेतली जात आहे.रायगड जिल्हाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच टँकर उपलब्ध करून दिले आहेत.त्या टँकरचे माध्यमातून पाणीटंचाई ग्रस्त गावे आणि वाड्या यांची तहान भागवली जात आहे. सध्या उमरोली ग्रामपंचायत मधील आशाणे आणि कोशाने या गावाबरोबर याच ग्रामपंचायत मधील कोशाने ठाकूर वाडी तर किरवली ग्रामपंचायत मधील सावरगाव ठाकूर वाडी आणि किरवली ठाकूर वाडी मध्ये टँकरने पाणी पोहचत होतें.आता त्यात भर पडली असून पळसदरी, ओलमन ग्रामपंचायत मधील झुगरेवाडी या दोन गावांना देखील टँकर सुरू करण्यात आले आहेत.तर पळसदरी ग्रामपंचायत मधील वर्णे ठाकूरवाडी,खांडस ग्रामपंचायत मधील जांभूळवाडी, नांदगाव ग्रामपंचायत मधील चिमटेवाडी आणि कळंब ग्रामपंचायत मधील बोरीची वाडी अशा सात आदिवासी वाड्यांमध्ये शासकीय टँकर पाणी पोहचवले जात आहे.