कर्जत तालुक्यात येत असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाबाबत काय भूमिका घ्यायची? यासाठी कर्जत बचाव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. ॲड. कैलास मोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे,तसेच जगदीश ठाकरे, प्रवीण गांगल, मोहन ओसवाल, नितीन परमार, रंजन दातार, ऍड. संदीप घरत, संदीप बोराडे, सतीश मुसळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ॲड कैलास मोरे यांनी टोरंट जल विद्युत प्रकल्प होऊ नये म्हणून जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरु आहे, लवकरच ती दाखल करण्यात येईल. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येईल त्यासाठी जनजागृती म्हणून कर्जत येथे 20 मे पासून धरणे आंदोलन करावे लागेल. एक कोअर कमिटी स्थापन करून निर्णय घेणे सोपे पडेल. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या खर्चासाठी आर्थिक मदत एकत्र करून ही याचिका दाखल करण्यात येईल असा निर्णय जाहीर केला.
जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी येणाऱ्या खर्चा पैकी एक लाख रूपये मी आणि आमचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी मदत करू असे जाहीर केले. टोरंट प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाचे रान करू अशी माहिती देतानाच मला प्रकल्पवाल्यांकडून ‘आपण बसू’ असे निरोप येतात. मात्र प्रकल्प पूर्ण बंद झाल्यावर आपण स्वस्थ बसणार नाही असे जाहीर केले.पर्यावरण प्रेमी मंगेश शितोळे यांनीही टोरंट प्रकल्प किती घातक आहे,त्याबद्दल माहिती देत हा प्रकल्प नको अशी मागणी केली.ॲड योगेश देशमुख यांनी टोरंट जलविद्युत प्रकल्प झाल्यास आपल्याला जगणे कठीण होईल असे सांगितले.प्रवीण गांगल यांनी लोक वर्गणी जमा केल्यास लोकांचा अधिक सहभाग होऊन एक वेगळे आंदोलन उभे राहील असे सूचित केले. यावेळी स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ कोठारी,तसेच ॲड रवींद्र गायकवाड,डॉ प्रशांत सदावर्ते,धर्मेंद्र मोरे, कृष्णा जाधव,विजय बेडेकर,आदी मान्यवर यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.






