भगवान चंचे यांनी आपल्या निवेदनात प्रशासक काळातील अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवले आहे. प्रशासक काळात अनेक ठिकाणी पाणी कनेक्शन देण्यात आले, ज्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. मात्र, यातील एक रुपयाही ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामसभेचा विरोध डावलून ममदापूर भागातील बिल्डरांना पाणी पुरवण्यात आले. संबंधित बिल्डर दोन एचपी च्या मोटारीने पाणी उपसा करत असतानाही ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आणि तुलसी बिल्डिंगला २५ कनेक्शन दिले असून त्याचे पैसे जमा नाहीत, तसेच घरपट्टीच्या नावाखाली घेतलेले लाखो रुपये नेमके गेले कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच ग्रामपंचायतीकडे वीज बिल भरण्यास पैसे नसल्याने नेरळ शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस खंडित झाला होता. या परिस्थितीला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असून, जनतेचा पैसा जनतेच्याच कामासाठी वापरला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी चंचे यांनी केली आहे.दरम्यान ग्रामपंचायतीच्या या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी. जर ६ एप्रिलपर्यंत कारवाई झाली नाही, तर मी आमरण उपोषणाला बसणार असून, माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भगवान चंचे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये पाणी वितरण व्यवस्था करताना आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून आले.ममदापूर ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळपाणी योजना असताना तेथे नळजोडण्या देण्यात आल्या. अनेक बांधकाम व्यावसायिक यांना नळजोडण्या देऊन पाण्याचे वितरण केलं जात. मात्र त्याची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायत मध्ये दिसली नाही. दरम्यान या गैरव्यवहाराबाबत नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला. ग्रामपंचायतीचं पाणी परस्पर बिल्डरांना दिला जात असल्याचा आरोप भगवान चंचे व नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी आरोप केला आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून तापला आहे.






