
Apple Farming in Maharashtra, Wai Pasarni Apple Plantation,
Pachgani News: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पाचगणी परिसरालगत असलेल्या पसरणी घाटातील एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार करून दाखवले आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या जमिनीत थेट सफरचंदाचे उत्पादन घेऊन बापू उर्फ राजू भिलारे यांनी शेतीत नवा इतिहास घडवला आहे. अवघ्या दोन एकर क्षेत्रात तब्बल सहाशे सफरचंदाची झाडे लावून त्यांनी राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला यशस्वी प्रयोग साकार केला आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल थेट पुणे विभागीय आयुक्त तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनी घेत त्यांच्या कार्याचे गोड कौतुक केले आहे.
महाबळेश्वर-पाचगणीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या आणि थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या पसरणी घाट परिसरात बापू भिलारे यांनी काही वर्षांपूर्वी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा प्रयोग ऐकून अनेकांनी शंका व्यक्त केल्या. महाराष्ट्रात, विशेषतः साताऱ्यात सफरचंदाचे उत्पादन शक्य नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मात्र या सर्व शंका आणि अडथळ्यांना न जुमानता भिलारे यांनी चिकाटीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा प्रयोग सुरू ठेवला.
सफरचंद लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतांचा वापर आणि हवामानाशी सुसंगत व्यवस्थापन या सर्व बाबींवर त्यांनी विशेष लक्ष दिले. सुरुवातीच्या काळात हवामानातील बदल, रोगराई आणि वाढता खर्च या अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे आज त्यांच्या बागेत लालचुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांची झाडे बहरलेली दिसत आहेत.
या अनोख्या प्रयोगाची माहिती मिळताच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी स्वतः पसरणी येथे भेट देत बागेची पाहणी केली. त्यांनी शेतातील ताज्या सफरचंदांचा आस्वाद घेत उत्पादनाची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. “महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच अनोखा प्रयोग असून काश्मिरी सफरचंदाच्या तोडीचे दर्जेदार आणि रसाळ उत्पादन येथे होत आहे. बापू भिलारे यांनी केलेले हे दिशादर्शक काम इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
याचप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या बागेला भेट देत भिलारे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानानुसार वेगवेगळी फळपिके घेण्याची मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत नवीन प्रयोगशील शेतीकडे वळणे गरजेचे आहे. बापू भिलारे यांनी दाखवून दिलेला मार्ग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.” जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील काळात प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही दिले.
Mumbai Crime: अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?
आज भिलारे यांच्या बागेला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक आणि शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. लालसर आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहताना अनेकांना काश्मीरमधील सफरचंद बागांची आठवण होते. केवळ पर्यटकच नव्हे, तर कृषी अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरीही या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी पसरणीकडे धाव घेत आहेत.
या यशामागे बापू भिलारे यांची मेहनत, जिद्द आणि आधुनिक शेतीविषयक दृष्टी महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी वेळोवेळी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि शेतीमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी दाखवली. परिणामी, आज त्यांच्या बागेतून मिळणारे सफरचंद केवळ दिसायलाच आकर्षक नाही, तर चवीनेही उत्कृष्ट असल्याचे ग्राहक सांगतात.
या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. पारंपरिक शेतीतून मर्यादित उत्पन्न मिळत असताना अशा नव्या प्रयोगांमुळे उत्पन्न वाढवण्याचे नवे मार्ग उपलब्ध होत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. बापू भिलारे यांनी दाखवून दिलेला मार्ग हा केवळ एका शेतकऱ्याचा यशाचा प्रवास नसून संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा बनली आहे. जिद्द, मेहनत आणि आधुनिक विचार यांची सांगड घातली तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते, हे बापू भिलारे यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे साताऱ्याचे नाव राज्याच्या शेती क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचले असून भविष्यात अशाच नव्या प्रयोगांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.