मेढा : कोयनेचा सुपुत्र देशाचा हिरो ठरला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केले नसून मराठी माणसाच्या हितासाठी उठाव केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर सर्वांनी मुख्यमंत्र्यांना खंबीरपणे साथ द्यायला हवी, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला १०५ गावाने पाठिंबा दिला.
आमच्या कोयना, सोळशी कांदाटी खोऱ्याचा मुख्यमंत्री झाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी १०५ गावातील जनता खंबीरपणे उभी राहणार आहे. या विभागातील सुपुत्र म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला आणि विचारांना आमचा एकमुखी पाठिंबा आणि समर्थन असल्याचा निर्णय सर्वपक्षीय कोयना, सोळशी, कांदाटी गाव समाज बैठकीत एकमताने घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा व समर्थन देण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या आहिर येथे कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील गावातील ग्रामस्थांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे व भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष धोंडीबाशेठ धनावडे, मार्केटयार्डचे संचालक विठ्ठलशेठ धनावडे, शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार, विभागप्रमुख लक्ष्मण कदम, उपविभाग प्रमुख शंकर कदम, उपतालुका प्रमुख बबन सकपाळ, युवासेनेचे राम सकपाळ, मधूसागरचे संचालक राजेश उतेकर, बाजार समितीचे संचालक संजय मोरे, ४३ गाव समाज अध्यक्ष कोंडीबा शिंदे, २२ गाव समाज अध्यक्ष आनंद नलावडे, जावली बँकेचे माजी सचालक बजरंग संकपाळ, चंद्रकांत संकपाळ, हरिभाऊ संकपाळ, गंगाराम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे म्हणाले, शिंदे साहेबांनी ही भूमिका का घेतली? याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. तुमची, आमची मराठी माणसांची शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान सुरू होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या संस्कारात वाढलेल्या शिंदे साहेबांना ते योग्य वाटले नाही. मराठी माणसांची मान, सन्मान असलेली शिवसेना वाचवण्यासाठी साहेबांना उठाव करावा लागला.
मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. मराठी माणसाने त्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मातृभूमीत सगळ्या गावांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला व त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे निश्चितच त्यांना बळ मिळणार आहे.






