
जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान (Photo Credit- X)
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), भोकरदन उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. बदनापूर तालुक्यातील आठ, जालना तालुक्यातील एक आणि भोकरदन तालुक्यातील १६ गावांतून हा मार्ग जाणार आहे. त्यामुळे या २५ गावांमधील सुमारे १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. प्रकल्पाअंतर्गत जालना तालुक्यातील एक आणि बदनापूर तालुक्यातील आठ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ३० मार्च २०२६ ला प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक
शेतक-यांनी जमिनीची मोजणी, क्षेत्रफळ, मालकी हक्क, बांधकामे, विहिरी, बोअरवेल, फळझाडे, वनझाडे, पाइपलाइन आदी बाबींच्या नोदींबाबत हरकती नोंदवल्या आहेत. आतापर्यंत २५० हरकती प्रशासनाकडे आल्या आहेत.
हरकती दाखल करण्यासाठी अजून पाच दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर आलेल्या सर्व हकरतीवर सुनावणी होणार आहे. जालना-जळगाव रेल्वे मार्गासाठी १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होत आहे. भूसंपादन प्रक्रियेवर जमीन मालकांना हरकती दाखल करण्यासाठी आठ जूनपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत अडीचशे हरकती आल्या आहेत. मुदत संपल्यानंतर हकरतीवर गांभीर्यानुसार सुनावणी होऊन त्या निकाली काढत्या जातील.
शेतक-यांनी भूसंपादन होत असताना मुल्यांकन कमी केल्याची तक्रारी केल्या आहेत. मात्र, भूसंपदानची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या स्थितीनुसारच शेतजमिनीवरील बाबींचे मूल्यांकन करण्यात येत आहे. अधिसूचनेनंतर शेतजमिनीवर फळबाग, नवीन बांधकामे किंवा अन्य बदल भरपाईसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.
जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र अजिंठा लेणी, तीर्थक्षेत्र राजूर गणपती मंदिर, पुढे थेट दिल्ली-कोलकता मार्गाशी जोडणारा हा मार्ग आहे.