
पादुका दर्शन साेहळ्यातील उलाढालीत मोठा घोळ! कदम महाराजांनी हात झटकले; प्रकरणाला नवे वळण
लातूर : लातूर येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आर्थिक व्यवहारात घोळम घोळ असल्याचेच महाराज लोकांनी घेतलेल्या पत्र परिषदेत स्पष्ट झाले आहे. या उत्सवाच्या हिशोबाबाबत कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, असेच चित्र समोर आले आहे. या पादुका दर्शन सोहळ्याच्या निधीतील तीन कोटी रुपये घेऊन एक महाराज फरारी झाले असल्याचा बातम्या समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. हातात पिस्तूल असलेला त्या महाराजांचा फोटोही सोबत झळकत आहे.
या पार्श्वभूमीवर लातूर येथे उत्सवाच्या आयोजकांपैकी काही जणांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर विठ्ठल कदम महाराज उर्फ छोटे माऊली यांनी आपली बाजू मांडली. उत्सवाच्या आर्थिक बाबींशी आपला काडीचाही संबंध नाही. आपण फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते जबाबदार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
पादुका सोहळ्याच्या निधीचे गूढ कायम
प्रचंड गदारोळात झालेल्या या पत्रकार परिषदेतून काहीच निष्पन्न झाले नाही. ना हिशोब सादर झाले, ना फरारी महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भाषा झाली, पत्रकार परिषदेची सुरुवात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ च्या गजरात झाल्यानंतर कदम महाराज बोलायला उठले. संतांच्या मांदियाळीतील जगद्गुरु तुकोबा, संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लातूर नजीकच्या खंडापूर येथे हा उत्सव मांडव टाकण्यात आला होता. हेलिकॉप्टरने आणलेल्या या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लक्षावधी भाविक मराठवाड्याच्या पंचक्रोशीतून खंडापूरला लोटले होते. सोहळ्यासाठी जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी गेला कोठे, या प्रश्नाचे उत्तर मात्र पत्रकार परिषदेत मिळाले नाही. या उत्सवाचे आर्थिक आणि सांस्कृतिक असे दोन विभाग होते. आपण उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत प्रामाणिकपणे सास्कृतिक विभाग सांभाळत होतो. सप्ताहातील एकही दिवस आपण निधी गोळा करणाऱ्या टेबलपाशी फिरकलो नाही. किती पावती पुस्तके छापली, किती वाटली गेली, किती परत आली यापैकी कशाचाही माझा संबंध नाही. मी माझ्या खर्चाने उत्सवासाठी आलो होतो आणि माझ्या खर्चानेच परत गेलो. उत्सवाच्या आर्थिक व्यवहाराशी माझा कसलाही संबंध नाही. निधी गोळा करणाऱ्यांनी पैसा कसा आला, कसा गेला, काहीही सांगितलेले नाही, असे कदम महाराज म्हणाले. हिशोब तपासणीसांनी हिशोब दिले ते मी इथल्या काही आयोजकांकडे दिले, असेही कदम महाराज म्हणाले.
हिशोबाचा ठावठिकाणा नाही; आयोजकांवर प्रश्नचिन्ह
कदम महाराज म्हणाले, यापूर्वी पादुका दर्शनाचे सहा सोहळे महाराष्ट्रात झाले. लातूरचा हा सातवा सोहळा होता. पूर्वीच्या सहा सोहळ्यांचे नोंदणीकृत ट्रस्ट होते. त्यांचे लेखापरीक्षणही झाले. लातूरच्या पादुका दर्शन उत्सवाचा ट्रस्ट धर्मादाय आयुक्त नोंदला गेलेला नाही. या उत्सवाच्या किशोर महाराज नावाच्या आयोजकांनी मला, ‘तुम्ही खर्चाची चिंता करू नका. तुम्ही फक्त सांस्कृतिक विभाग बघा’ असे सांगितलेले होते. ते ट्रस्ट करतो म्हणाले. पण झाला नाही. खरे म्हणजे, आमटी भाकरीची पंगत असते त्याच दिवशी निधी गोळा करण्याची प्रथा आहे. लातूरच्या उत्सवाच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले दोन महिने आधीच निधी गोळा करण्यास प्रारंभ झाला होता, असे सांगून महाराज म्हणाले, देणगी काउंटरवर आपण एकही दिवस गेलो नाही. हिशोब कोणालाच दिला गेलेला नाही. पहिले दोन दिवस तर हिशोबाचा स्थान पत्ताच नव्हता. पैसा लातूरचा, हिशोब लातूरचा, आयोजक लातूरचे, आणि हिशोब मात्र मी कसा काय द्यायचा ? माझा आर्थिक गोष्टींशी दूरान्वयानेही संबंध नाही. मी कोणाकडून हिशोब घेणारही नाही. कोणाला मागणारही नाही. माझ्या पाया पडणारे भाविक जे पैसे ठेवत होते, त्या 50,284 रुपयांचा हिशोब मी दिला.
आता जिल्हा तुमचा, पैसा तुमचा, उत्सवाचे आयोजक तुम्ही, उत्सवाच्या तारखा तुम्ही दिल्या. मी फक्त दोन-तीन उत्सवाच्या तारखा दिल्या होत्या. त्यामुळे हिशोबाला मी जबाबदार नाही. माझ्या नावापुढे एक रुपयाही लिहिलेला नाही. निधी किती गोळा झाला याची चौकशी मी एकही दिवस केली नाही. रक्कम रोज संध्याकाळी कोण घेऊन जात होते, मला माहित नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आपण सारेच ईश्वरी न्यायाला सामोरे जाऊ या. बनावट पादुकांच्या घेतल्या गेलेल्या आक्षेपाबद्दल बोलताना ते म्हणाले की, संतांच्या वंशजांनी आणलेल्या त्या उत्सव पादुका होत्या. वंशज ही उपासना आहे, तर विश्वस्त ही व्यवस्था आहे, असे सांगून ते म्हणाले, किशोर महाराज कोठे आहे ही मी कसे सांगणार? माझ्यापासून त्यांना धोका नाही. उलट त्यांच्यापासून मला धोका आहे त्यांच्याकडे पिस्तूल आहे, असे ते शेवटी म्हणाले.