मासेमारी बंद काळात मच्छीमारांना 20-22 हजार रुपयांची मदत देण्याचं नियोजन
राज्य सरकारकडून विविध घटकांसाठी निर्णय आणि घोषणांचा धडाका सुरू असतानाच आता मच्छीमारांसाठीही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मासेमारी बंद असलेल्या काळात मच्छीमारांना थेट आर्थिक मदत देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
माशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर काही काळ बंदी असते. या काळात मच्छीमारांच्या उत्पन्नाचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्याचा विचार सुरू असल्याचं राणे यांनी सांगितलं.
माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना जवळपास 20 ते 22 हजार रुपयांचं आर्थिक अनुदान देण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असंही राणे यांनी सांगितलं.
दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात काय केलं, हे जनतेने पाहिलं आहे, असा टोला राणेंनी लगावला.
‘तुमसे ना हो पायेगा’ अशी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ‘तुमसे ना हो पायेगा’चे ब्रँड अॅम्बेसेडरच उद्धव ठाकरे आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.
राज्यातील काही भागांत पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचंही राणेंनी मान्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीबाबत बोलताना राणेंनी सध्या त्यावर भाष्य करणं टाळलं. सीबीआयकडून चौकशी सुरू असून प्रकरण न्यायालयातही प्रलंबित असल्याने चौकशीत अडथळा येईल असं कोणतंही वक्तव्य करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या प्रकरणावर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे वारंवार बोलत असल्याने आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात, असं सूचक विधान नितेश राणेंनी केलं.






