
मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. असे असतानाही पुणे, मुंबईहून मराठवाड्यातील मार्गावर एकही उन्हाळी विशेष रेल्वे सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी हंगामात पुणे-नांदेड, पुणे-लातूर, पुणे-परभणी या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा अद्याप अतिरिक्त गाड्यांची घोषणा न झाल्याने प्रवासासाठी तिकिटे मिळवणे अवघड झाले आहे.
मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुट्टीत हे प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी जातात. तसेच, मराठवाड्यातील नागरिक पर्यटनासाठी सुट्टीत जातात. त्यामुळे पुणे ते नांदेडदरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट लांबली असून, जनरल व स्लीपर डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून मराठवाड्यासाठी विशेष गाड्या न सोडण्यामागे मार्गावरील ताण, फलाटांची कमतरता आणि क्षमता पूर्ण झाल्याची कारणे दिली जात आहेत. मात्र, उत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडल्या जात असताना पुणे-मराठवाडा मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
गेल्या वर्षी पुणे-पनवेल-नांदेड तसेच इतर काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर पुणे-नांदेड, पुणे-लातूर आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी विशेष तयारी
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, लवकरच प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (ता.२४) या पाच नव्या सुधारणांना मंजुरी दिली. यामुळे २०२६ मधील रेल्वे सुधारणा उपक्रमांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीट उपलब्ध व्हावे आणि शेवटच्या क्षणी होणारी सट्टेबाजीची बुकिंग थांबवावी, हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.