कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
एकीकडे शहरातील कलाकार, नाट्यरसिक आणि नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे नाट्यगृहाच्या वातानुकूलन व्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान एसी व्यवस्था कोलमडल्याने कलाकारांना आणि प्रेक्षकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. परिस्थिती इतकी गंभीर होते की, प्रयोगासाठी आलेल्या कलाकारांनाच प्रेक्षकांची माफी मागण्याची वेळ येते.
यापूर्वी ‘आमने-सामने’, तसेच अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांसारख्या कलाकारांच्या कार्यक्रमांदरम्यानही वातानुकूलन व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे प्रश्न केवळ एसी बिघडण्याचा नसून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीचा आहे.
दुसरीकडे आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाची अवस्थाही काही वेगळी नसल्याचे चित्र समोर आले आहे. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र, याच महत्त्वाच्या बैठकीदरम्यान सभागृहाच्या छताला गळती लागल्याने प्रशासनाची अक्षरशः फजिती झाली. मोठमोठे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित असताना सभागृहाच्या छताला गळती लागणे ही बाब महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या वास्तूंची अशी अवस्था होत असेल, तर या वास्तूंची देखभाल नेमकी कोण करणार आणि त्यासाठी महापालिकेची यंत्रणा काय करत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे या सभागृहांचे भाडेही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाणारे असून कार्यक्रमांसाठी हजारो ते लाखो रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. मग एवढे भाडे आकारूनही नागरिकांना आणि कलाकारांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या वास्तूंचा उपयोग तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य वास्तू उभारल्या, त्यांचे लोकार्पण केले आणि त्यानंतर देखभालीकडे दुर्लक्ष केले, तर काही वर्षांत या वास्तूंची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. आज एसी बंद, उद्या छताला गळती आणि पुढे आणखी कोणती समस्या निर्माण होणार? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. महापालिकेने केवळ उद्घाटनाच्या फिती कापण्यापुरते मर्यादित न राहता या वास्तूंची नियमित देखभाल, तांत्रिक तपासणी आणि तत्काळ दुरुस्तीची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
अन्यथा, जनतेच्या पैशातून उभारलेल्या या कोट्यवधींच्या वास्तू काही वर्षांतच भव्य इमारती नव्हे, तर महापालिकेच्या निष्काळजी कारभाराची स्मारके ठरतील, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






