पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
माथेरानमध्ये वाहनांना प्रवेश नसल्यामुळे दस्तुरी नाका हा पर्यटकांसाठी महत्त्वाचा प्रवेशबिंदू आहे. कारमधून उतरल्यानंतर अनेक पर्यटक येथून पुढे पायी किंवा अन्य स्थानिक वाहतूक साधनांच्या मदतीने शहरात जातात. मात्र दस्तुरी नाका ते माथेरान शहराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्री येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.
Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर
दस्तुरीपासून बाजारपेठेकडे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज रोड तसेच महात्मा गांधी रस्त्याच्या परिसरात अनेक पथदिवे बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे.
दस्तुरी नाका ते माथेरानमधील अहिल्यादेवी होळकर चौक या मार्गावरही पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील पथदिव्यांची वायर अज्ञात व्यक्तीने कापल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे नेमके कारण स्पष्ट होणे आवश्यक आहे. पर्यटक २४ तासांतील कोणत्याही वेळी माथेरानमध्ये दाखल होत असतात. अशावेळी रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यावरील पुरेशी प्रकाशव्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरते.
माथेरान हे पर्यटकांसाठी सुरक्षित आणि वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षातील बाराही महिने येथे पर्यटकांची वर्दळ असते. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गावरच पथदिवे बंद असल्यास रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
माथेरानमधील पथदिव्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदाराने रात्रीच्या वेळी विविध भागांची पाहणी करून कोणत्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत, याची माहिती घेणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असूनही ते पूर्ववत होत नसल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या माथेरानसारख्या शहरात मूलभूत सुविधांची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे. विशेषतः पर्यटकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंध असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे. दस्तुरी नाका ते बाजारपेठ आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील बंद पथदिवे कधी सुरू होणार, तसेच पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियुक्त ठेकेदाराकडून नियमित पाहणी केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.






