
मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
महानगरपालिकेमध्ये बदली प्रक्रिया प्रामुख्याने दोन विभागांमार्फत राबवली जाते. पहिला म्हणजे सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department), ज्यामार्फत प्रशासकीय संवर्ग यांच्या बदल्या केल्या जातात. तर दुसरा म्हणजे नगर अभियंता कार्यालय, ज्यामार्फत त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांमधील अभियंता संवर्ग तसेच प्रशासकीय संवर्गाच्या बदल्या केल्या जातात.
मात्र, या दोन्ही विभागांमधून होणाऱ्या बदल्यांच्या प्रक्रियेमुळेच वशिलेबाजी आणि आर्थिक गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही कर्मचारी आपल्या संपूर्ण सेवा कालावधीत सामान्य प्रशासन विभाग किंवा नगर अभियंता कार्यालयातच कार्यरत राहतात. नियमांनुसार ठराविक कालावधीनंतर बदली अपेक्षित असतानाही, अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केवळ विकास नियोजन, मालमत्ता यांसारख्या मुख्यालयापुरत्याच मर्यादित राहतात.
विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती लिपिकापासून मुख्य लिपिक आणि पुढे प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत झाली असली, तरी त्यांची संपूर्ण सेवा ही मुख्यालयातच पार पडल्याचे दिसून येते. यामुळे इतर विभागांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
दरम्यान, योगेश वीर या लिपिक पदावरील कर्मचाऱ्याच्या बदली प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ते अकरा वर्षे नगर अभियंता विभागात कार्यरत होते. नियमानुसार तीन वर्षांनी बदली अपेक्षित असतानाही त्यांनी दीर्घकाळ एकाच म्हणजे नगर अभियंता विभागात सेवा बजावली. अलीकडेच त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली होती, मात्र त्यांनी नव्या विभागात रुजू न होता पुन्हा नगर अभियंता कार्यालयातच कार्यरत राहिल्याचे समोर आले आहे.
नियमानुसार, बदली आदेशानंतर तीन दिवसांच्या आत नवीन विभागात रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याचा पगार थांबविणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात तसे झाले नसल्याने नगर अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय, संबंधित कर्मचारी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवत नगर अभियंता कार्यालयातच हजर राहिल्याची माहितीही पुढे आली आहे.
तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागात सफाई कामगारांच्या सेवा नोंदी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या आणि रजा पडताळणी यांसारख्या महत्त्वाच्या बाबी हाताळल्या जातात. अशा विभागात बदली आदेश रद्द होणे किंवा कर्मचारी रुजू न होणे यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होऊन सफाई कामगारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
योगेश वीर यांची बदली ही एक आठवड्याच्या कालावधीनंतर त्वरित घनकचरा व्यवस्थापन विभागातील बदली बदलून पुन्हा मुख्यालयातीलच सहाय्यक आयुक्त मालमत्ता विभागात करण्यात आल्याचे समजते. सहाय्यक आयुक्त मालमत्ता हा विभाग याआधीच मालमत्ता प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत केंद्र बनल्याचे बोलले जाते. योगेश वीर हे महानगरपालिकेचे जावई असल्यासारखे म्हणजे पुन्हा आता मालमत्तेच्या संभाव्य आर्थिक गैरव्यवहार, नियमभंग यांसारख्या प्रकरणांमध्ये बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले जाते.
मुळात एक आठवड्यापूर्वी योगेश वीर यांचे निघालेले घनकचरा व्यवस्थापन मधील बदलीचे आदेश हे नगर अभियंता यांमार्फत बदलून मालमत्ता विभागात होऊच कसे शकतात. या सर्व घडामोडींमुळे सामान्य प्रशासन विभाग आणि नगर अभियंता कार्यालय हे बदल्यांमधील गैरप्रकारांचे केंद्र बनल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बदली प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त तसेच श्रीमती अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती अश्विनी जोशी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.